संतोष माने SM News:
आरग ता. मिरज येथे संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 09.00 वा. विठ्ठल मंदिर, आरग येथे प्रसिद्ध शिवचरित्रकार ह.भ.प.गंगाधर महाराज कुरुंदकर(हिंगोली) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तनासाठी आरग गावातील तरूण मंडळी, मोठी माणसे व स्ञियां भरपूर संख्येने हजर होत्या.
किर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरा इतिहास पोहचवण्याचे काम महाराज करत आहेत. किर्तनाची सुरवात करताना महाराजांनी
बहुजन समाजासाठी ज्या-ज्या महामानवांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्या-त्या सर्व महामानवांना प्रथमत: अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छञपती शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा राजांनी तुकाराम महाराजांसाठी मूल्यवान रत्ने, जवाहिरात भेट म्हणून आणली होती. राजांनी आणलेल्या भेटवस्तू तुकाराम महाराजांनी नाकारल्या व या वस्तू स्वराज्याच्या कामी लावा, स्वराज्याचे सुराज्य करा. दिलेली आश्वासने पूर्ण करा असे सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून शिवबांना जो उपदेश दिला त्या अभंगावर गंगाधर महाराजांनी संपूर्ण किर्तन केले. तो अभंग असा;
आम्ही तेणे सुखी | म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥1॥
तुमचे येर वित्त धन | ते मज मृत्तिकेसमान॥2॥
कंठी मिरवा तुळशी | व्रत करा एकादशी॥3॥
म्हणवा हरीचे दास | तुका म्हणे मज हे आस॥4॥
महाराज आपल्या किर्तनात अनेक विषयांवर बोलले. अगदी बळीराजापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत व तुळशीच्या लग्नापासुन ते संभाजी राज्यांच्या हत्येपर्यंतचा सर्व खरा इतिहास सांगितला. शेतकर्यांच्या व्यथा, स्वामीनाथन कृषी आयोग याबद्दल जागृत केले. लोकांना जागृत करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. आपले बहुजन महापुरूष जगापर्यंत पोहचवायचे असतील तर त्यांची जयंती-पुण्यतिथी ही तिथीप्रमाणे न साजरी करता तारखेप्रमाणे केली पाहिजे, असे महाराजांनी सप्रमाण पटवून दिले. 'वारकरी' नावाच्या दिनदर्शिकेमध्ये सर्व बहुजन महामानवांच्या जन्मतारखा ह्या तारखेप्रमाणे दिलेल्या आहेत. अशी दिनदर्शिका त्यावेळी भरपूर लोकांनी विकत घेतली. 'पुस्तकाने मस्तक सुधारते व जे मस्तक सुधारलेले असते ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही' त्यामुळे वाचन करा. खरा इतिहास वाचा, कारण 'वाचाल तर वाचाल'. खरा इतिहास समजून घेण्यासाठी शिवश्री विकास पाटील यांनी 'प्रबोधन एक्सप्रेस' नावाची पुस्तकांचा स्टाॅल असलेली गाडी आणली होती.
किर्तन साधारणतः 03 तास चालले. किर्तनाचा शेवट विठ्ठलाची व तुकाराम महाराजांची आरती होऊन करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा